पुणे : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असो अथवा भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकार असो; आमच्या पक्षाला म्हणावी तशी मते पडत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागते. त्यामुळे आगामी काळात पक्ष बांधणीवर भर देणार असून, पक्षाची ताकद वाढविणार आहे,’ असा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय)राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
‘आरपीआय-ए’तर्फे आयोजित राज्यव्यापी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, स्थानिक नेते आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, महिला नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
आठवले म्हणाले, ‘आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र यावे. शिवसेनेने आपल्या सोबत यायला हवे. आपापसातील नाराजी दूर करून २०१९च्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी मोदींसोबत येऊन एकत्रित निवडणूक लढवावी. शिवसेना सोबत असेल, तर महाराष्ट्रामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. उद्धवजी योग्य वेळेस निर्णय घेतील, तसेच लोकसभेला दोघेही एकत्र येतील असा विश्वास आहे.’
‘पुढच्या पाच वर्षांची संधी मिळाली, तर नक्कीच कायापालट करणार व मंत्रिमंडळात नक्कीच ‘आरपीआय’ला संधी मिळवून देणार. सत्ता मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना संधी मिळेल. ‘आरपीआय’ला सत्तेचा हवा तास सहभाग मिळत नाही. पक्षाचा वापर होत आहे, काँग्रेस सोबत देखील असाच अनुभव होता. काँग्रेस पक्षासोबत राहून एकही आमदार निवडून आला नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून आणले आहे, इतर पक्षांचा भरोश्यावर न राहता ५० टक्के जागा नॉन दलितांना निवडून आणण्याचा प्रयत्न राहील. पक्षाला नॉन दलितांची मते ट्रान्सपर करणारा उमेदवार हवा आहे,’ असे आठवले यांनी सांगितले.
‘आगामी निवडणूक काळात शिवसेना आणि भाजपने युती केली दोन्ही पक्षांचा फायदा होईल,’ असे सांगताना ते म्हणाले की, ‘पालघर आणि भंडारा-गोंदिया येथे भाजप आणि शिवसेनेची भाषा ही निवडणुकीची आहे; मात्र शिवसेनेने युती केली नाही, तर त्यांचे काही नेते फुटू शकतात. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे, तर युती करायलाच हवी.’
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांना भेटण्याची विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधीला एकत्र आलेल्या मोदी विरोधकांवर त्यांनी भाष्य केले. ‘जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढे मोदींना विजय मिळवण्यास सोपे जाईल. भाजपच्या नव्या धोरणाला अनुसरून त्यांनी नियत साफ, विकास साफ आणि २०१९साली काँग्रेसही देशातून साफ होईल,’ असा विश्वास व्यक्त केला.
एका पत्रकार परिषदेत भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना रामदास आठवलेंबद्दल प्रश्न विचारला असता, कोण आठवले, असा प्रतिप्रश्न आंबेडकरांनी केला होता. त्याबाबत आठवले यांनी विचारले असता ते म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकरांना आठवले कोण हे माहित नसले, तरी मला आंबेडकर कोण आहेत हे माहित आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असणारे, दलित ऐक्याला विरोध करणारे, रामदास आठवले कोण, असे म्हणणारे प्रकाश आंबेडकर आहेत, असे असूनही मला त्यांच्याबद्दल आदर आहे.’